पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २६ जून २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ उत्साहात संपन्न झाले. २५ व २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात आयोजित या प्रबोधन पर्वामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला.

प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मंगला कदम,नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे,उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष जगदीश परिट, सचिव सुनील पाटील, खजिनदार मिलिंद वेल्हाळ, उत्सव प्रमुख पी. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
त्यानंतर मे.जयेंदू मातोश्री प्रोडक्शन यांनी ७० कलाकारांसह सादर केलेल्या ‘फोक संस्कृती’ या बहुरंगी लोककला कार्यक्रमाने उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस तसेच के.एस.बी.चौक येथील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दूस-या दिवशी शहरातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच नगरसदस्य कुशाग्र कदम,उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक सखाराम रेडेकर यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच पांडुरंग पाटील आणि संजय वडार यांना ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनील गाडे, तानाजी भोसले, विठ्ठल मर्दाने, संजय व्हराबळे, दत्ता फासके, वर्षा विजय नाळे, अश्विनी लहू पाटील, योगिता विनायक रणसुभे, माधवी मिलिंद वेल्हाळ आणि धनश्री अक्षय पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच युवराज मुळे, करण अनिल कारंडे आणि रेखाताई प्रकाश मुगडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर ‘गौरवशाली महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सायंकाळी साई मंदिर उद्यानात ‘स्वर स्वामी’ प्रस्तुत “वंदन- छत्रपती शाहू महाराजांना” या सांस्कृतिक कार्यक्रमाने शाहू महाराजांच्या कार्याला शाहिरी व गीतातून अभिवादन करण्यात आले.
















