महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०९ जून) : राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल का?
याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली होती. तर ईडीने त्याला आक्षेप घेतला होता. आता कोर्टानेच या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. उच्च न्यायालयनेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास आघाडीची मते दोनने घटणार आहेत. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सुनावणी झाली होती. कोर्टाने आज त्यावर निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, कोर्टाने आता ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आघाडीला धक्का बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार नाही. परिणामी त्यांची दोन मते घटणार असल्याचं सांगितलं जात आहे.