महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 21 ऑगस्ट — उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्का देण्यासाठी ‘; महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५’; सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया आणि निकष पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या २० ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकते –
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, किंवा स्थानिक पोलीस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत भाग घेता येईल.

निवडीचे निकष –
मंडळांची निवड खालील निकषांवर आधारित असेल, प्रत्येक निकषासाठी २० गुण देण्यात आले आहेत : कलांचे जतन व संवर्धन: गायन, वादन, नृत्य, नाट्य, दशावतार, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, खडीगंमत, वहिगायन, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, यांसारख्या विविध कलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच, लुप्त होत असलेल्या कलांचे संवर्धन करणे. संस्कृतीचे जतन / संवर्धन: दुर्मिळ नाणी, शस्त्र, भांडी यांचे प्रदर्शन, कवी संमेलन, पुस्तक मेळा, अभिवचन, वक्तृत्व, निबंध लेखन स्पर्धा यांसारखे साहित्यविषयक उपक्रम आयोजित करणे. पारंपारिक आणि देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे आणि ग्रंथालये चालवणे.
निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन: वने, निसर्ग, गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारकांचे जतन व संवर्धन करणे. स्वच्छता, पर्यटन, आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी जनजागृती करणे. सामाजिक कार्य : महिला, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक, आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध उपक्रम आयोजित करणे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित उपक्रम राबवणे, उदा. ‘; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’;. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, आणि समाजसुधारणेवर आधारित कार्यक्रम आयोजित करणे. अंधश्रद्धा आणि अनिष्ट चालीरीतींविरुद्ध प्रबोधन करणे.
गणेशोत्सव आयोजनातील विधायकता: पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट वापरणे. ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण टाळणे. गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, जसे की प्रथमोपचार पेटी आणि पाणी. ‘एक गाव एक गणपती’ सारखे विधायक उपक्रम राबवणे. मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३० टक्के
महिलांचा समावेश असणे.
मार्गदर्शक तत्त्वे या स्पर्धेसाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक समन्वयक असतील. मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेल्या मंडळांना या वर्षी पारितोषिकासाठी पात्र मानले जाणार नाही. हे इतर मंडळांना संधी देण्यासाठी आहे. मंडळांनी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून ते चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत केलेल्या कार्याचा विचार केला जाईल.
विजेत्या मंडळाला त्यांनी प्राप्त केलेला सर्वोच्च पुरस्कार दिला जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या मंडळाची तालुका आणि जिल्हा दोन्ही स्तरांवर निवड झाली, तर त्यांना जास्त रकमेचे जिल्हास्तरीय पारितोषिक दिले जाईल. स्पर्धा निवड समितीच्या निर्णयावर कोणताही आक्षेप घेता येणार नाही.
अर्ज कसा सादर कराल –
इच्छुक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ईमेलवर २२ ऑगस्ट २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्ज ऑनलाइन सादर करावा. अधिक माहितीसाठी, पर्यटन व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन यांचा २० ऑगस्ट २०२५ चा शासन निर्णय बघावा असे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी कळविले आहे.


