महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ फेब्रुवारी) : येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध अशा भव्य डे-नाईट क्रिकेट सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते, मनीष कुलकर्णी, निलेश जगताप, प्रवीण वाघमोडे यांनी केले आहे.
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप डे-नाईट क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात सोमवारी रात्री आठ वाजता पत्रकार विरुद्ध सांगवी पोलीस यांचा सामना घेण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण अटीतटीच्या सामन्यात सांगवी पोलीस संघाने बाजी मारत विजयाची बाजी मारली. पत्रकार संघाचे कर्णधार संजय मराठे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सांगवी पोलीस संघासमोर मोठी धावसंख्या उभारली. त्याचा पाठलाग करत सांगवी पोलीस संघानेही कडवी झुंज देत फलंदाजी केली. मात्र सांगवी पोलीस संघाची धावसंख्या रोखण्यात पत्रकार संघ अपयशी ठरला.
पत्रकार संघातील महादेव मासाळ, विजय गायकवाड, संदीप सोनार यांनी धावांचा डोंगर उभारला. उत्तम गोलंदाजी करताना प्रशांत माळसकर, हेमंत बाराथे यांनी सांगवी पोलिस संघातील दोन फलंदाज बाद केले. सांगवी पोलिस संघाने पत्रकार संघाच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देत शेवट पर्यंत कडवी झुंज दिली. सामन्यात संतोष महामुनी यांनी महादेव मासाळ यांना रनर म्हणून मोलाची साथ दिली.
मैत्रीपूर्ण अशा सांघिक खेळात पत्रकार संघाचे कर्णधार संजय मराठे, यांनी उत्तम गोलंदाजी करीत सांगवी पोलिसांची धावसंख्या रोखण्यात यश मिळविले. विजय गायकवाड यांनी यष्टीरक्षकांची भूमिका पार पाडत पोलिस संघातील महत्वाचे दोन फलंदाजांचे झेल घेत माघारी पाठविण्यात यश मिळविले. देविदास शेलार, बलभीम भोसले यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. संगीता पाचंगे, प्रज्ञा दिवेकर, राजश्री पवार यांनी पत्रकार संघाला खेळाच्या दरम्यान प्रोत्साहित केले.
या खेळात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी करत पोलिस संघाने विजय मिळवला. सांगवी पोलीस संघातील फलंदाज नारायण पाटील यांनी सर्वाधिक धावा करत मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला. यावेळी सांगवी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील तांबे यांनी दोन्ही संघातील खेळाडूंचे कौतुक करीत विजेत्या संघाचा सन्मान केला. अजय दुधभाते, दिपक मंडले, प्रदिप गुळमिरे आदी सहकाऱ्यांनी परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी सुसज्ज सुविधापूर्ण अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन व नियोजन केले आहे. त्याबद्दल क्रिकेट खेळाडू व प्रेक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.