महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मार्च) : देशभरातील जनता गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
चुनाव का पर्व, देश का गर्व या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. निवडणुकांच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
देशात ७ टप्प्यात मतदान होणार
पहिला टप्पा
मतदान – १९ एप्रिल
दुसरा टप्पा
मतदान – २६ एप्रिल
तिसरा टप्पा
मतदान – ७ मे
चौथा टप्पा
मतदान – १३ मे
पाचवा टप्पा
मतदान – २० मे
सहावा टप्पा
मतदान २५ मे
सातवा टप्पा
मतदान १ जून