महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ डिसेंबर) : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सामनातून केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. राज्यात महाविकास आघाडी सरकारनं अराजक माजवलं आहे. राज्यात 11 महिन्यात 2 हजार 270 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. मराठा आणि ओबीसी समाजातही निराशा पसरली आहे, अशी टीका पाटील यांनी ठाकरे सरकारवर केलीय.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आरोग्य विभाग तसंच एमपीएससी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालवलं. जाऊ तिथं खाऊ हेच या सरकारचं धोरण आहे. आपल्या डोळ्यातील मुसळ झाकून दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ पेरु नका. अन्यथा राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनथा उलथवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
▶️पवारांनी 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजलं- राऊत
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणाले.