महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ फेब्रुवारी) : मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुही निर्माण होईल, अशी बेधडक वक्तव्य करत चाललेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी अवघ्या 24 तासांपूर्वी मंत्रिपदाच्या राजीनामा दिल्याचे सांगितल्यानंतर आज (4 फेब्रुवारी) ते नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले. मात्र या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या वारी आपल्या दारी कार्यक्रमामध्ये तब्बल 80 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने वारी आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचवटी परिसरात एका लॉनवर हा कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल 80 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. त्यामुळे या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.
अहमदनगरमध्ये काल (3 फेब्रुवारी) ओबीसी रॅलीमध्ये छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट करताना आपण मंत्रिपदाचा राजीनामा 16 नोव्हेंबर रोजी दिल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विनंती केल्याने आपण आजवर शांत होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यावरुन पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर दौऱ्यात विचारण्यात आले असता त्यांनी याबाबतीत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा भुजबळ यांनी केलेले भाषण आणि त्यांनी दिलेल्या राजीनामा या संदर्भातील बोलणं झालं नसल्याचे सांगत त्यांनी सुद्धा अधिकची प्रतिक्रिया देणे टाळले.
सामान्य मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कारण नसताना भेद निर्माण होत चालला आहे. एकंदरीत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र एका बाजूने असतानाच त्यांना पाठिमागून कोणाची फूस तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे भाष्य केलं होतं. मात्र त्याबाबत अजून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.
दुसरीकडे, छगन भुजबळ घेत असलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही विरोध झालाच आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांकडूनही विरोध होत आहे. मात्र विरोधाला न जुमानता आपण अगोदरच राजीनामा दिल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे अडचण करून टाकली आहे. दुसरीकडे, त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद आव्हाड यांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. राजीनामा द्यायचा असेल, तर तो त्यांनी राज्यपालांकडे द्यावा. त्यांनी सरकारी बंगला सोडला आहे का? अशी विचारणा आव्हाड यांनी केली आहे.