महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नाव समोर आले होते. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दिल्लीतील लोकनायक भवन येथे आज ईडीसमोर हजर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी सुद्धा तयार केली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. तर, महिनाभरापूर्वी याप्रकरणी अभिषेक बच्चन यांचीही चौकशी सुरू झाली होती.
पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणी महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात गेले होते. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे.
▶️बच्चन कुटुंबाचे नाव का?
2016 मध्ये, ब्रिटनमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे कर दस्तऐवज ‘लीक’ झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारतातील तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक आयलँडमध्ये होते. हे 1993 मध्ये तयार केले गेले. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.
ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची संचालक बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते. ऐश्वर्याशिवाय वडील, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली, अशी सूत्रांची माहिती आहे.