Google Ad
Uncategorized

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या अथक प्रवासात ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला पार करत ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा विक्रमी ४५०० वा प्रयोग रविवारी (१० ऑगस्ट) चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात पार पडला.

‘सही रे सही’ नाटक २००२ मध्ये सुरू झाले, तेव्हा ते तब्बल २३ वर्षे चालेल किंवा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला पार करेल, असे कधीच वाटले नव्हते. मात्र, रसिक प्रेक्षकांनी नाटकावर आणि आम्हा कलावंतांवर उदंड प्रेम केले. रंगभूमीने आशिर्वाद दिला. त्यामुळेच ‘सही रे सही’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे आणि यापुढेही कायम राहील, अशी भावना प्रसिध्द अभिनेते भरत जाधव यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली.

Google Ad

केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित तसेच भरत जाधव यांची चौरंगी भूमिका असलेल्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा विक्रमी ४५०० वा प्रयोग पार पडला. याचे औचित्य साधून दिशा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने नाटकाच्या यशस्वी वाटचालीबद्दल केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. याशिवाय, प्रख्यात उद्योजक विजय पांडुरंग जगताप आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते भरत जाधव यांचा स्मृतीचिन्ह देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना भरत जाधव म्हणाले की, १५ ऑगस्ट २००२ रोजी मुंबईत छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्याआधी पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगीत तालीम होत होती. आजूबाजूचे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना आम्ही नाटकास बसा, अशी विनंती करायचो आणि त्यांचे अभिप्राय जाणून घेत होतो. पुढे जाऊन नाटक कमालीचे हीट झाले. रंगभूमीचा आशिर्वाद मिळाला. पहिल्या खेळापासून ते आजपर्यंत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. आता हे नाटक आमचे राहिले नसून ते पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचे झाले आहे. एकच कलाकार एकाच नाटकात सलगपणे २३ वर्षे काम करतो आहे आणि या संपूर्ण कालावधीत नाटकाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे, हे भाग्य मला मिळाले आहे. सही रे सहीला कायम पाठबळ देणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांच्या साक्षीने आम्ही ४५०० वा प्रयोग आणि त्यानिमित्ताने आनंद सोहळा आम्ही साजरा करत आहोत, याचा आमच्या टीमला खूपच अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांच्या निस्पृह प्रेमामुळे पाच हजार प्रयोगसंख्येच्या दिशेने ‘पुन्हा सही रे सही’ची वाटचाल सुरू राहणार आहे.

भरत जाधव म्हणाले की, २००७ मध्ये ‘गलगले निघाले’ या चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलो होतो, तेव्हा संपूर्ण शहर फिरलो. अनेक चांगले मित्र जोडले गेले. ‘गलगले’च्या शूटींगसाठी दिशा सोशल फाऊंडेशनच्या टीमने तसेच शहरवासियांनी भरपूर मदत केली, ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. तेव्हापासून या संस्थेशी असलेला स्नेह इतक्या वर्षानंतरही कायम आहे, असे ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, नाना शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर यांच्यासह राजेश सावंत, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे, विजय कांबळे, शरीफ शेख, बाजीराव लोखंडे, अविनाश ववले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!