Google Ad
Editor Choice

स्व.लोकनेते ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या नावाने शहरात विधी महाविद्यालय उभारण्याची आणि महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्याची सर्व पक्षीय शोकसभेत देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जानेवारी२०२३) : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शोकसभा घेण्यात आली.

 चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या श्रद्धांजलीसाठी आयोजित शोकसभेत त्यांच्याविषयीच्या भावना आणि पक्षनिष्ठेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भावूक झाले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात अग्रस्थानी म्हणून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव घेतले जाते. साधी राहणी, उच्च विचार व महान कार्य असणारे शहरातील अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या रुपाने हरपले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने शहरात विधी महाविद्यालय उभारण्याची आणि महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

Google Ad

 यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मनसेचे नेते बाबू वागसकर, निवृत्त विभागीय आयुक्त व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप बंड, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, प्रहारचे संजय गायखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे भारत महानवर, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाने जागा कमी पडल्याने बाहेर उभे राहून लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेस उपस्थिती दर्शवितभावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, “लक्ष्मणभाऊ हे आपले लाडके आणि उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मोठ्या व्यक्तीची प्रचिती त्याच्या कार्यातून येते. शरीराने फिट असणारा सहकारी मित्र गमावला. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही.आजाराच्या काळातही त्यांच्यात इच्छाशक्ती प्रचंड होती. पिंपरी-चिंचवडसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. संघर्षातून त्यांनी हे योगदान दिले. त्यांनी सामान्य माणसांशी आपली नाळ कधीच तुटू दिली नाही. ते कायम भूमीपूत्रांच्या समस्या प्रकर्षाने मांडायचे. सामान्य माणूस आणि भूमीपुत्रांच्या समस्या घेऊनच ते माझ्याकडे यायचे. जनसामान्यांचा नेता या रुपाने आम्ही त्यांना बघितले. कधी ते नाराज होत नव्हते. काम पूर्ण होईपर्यंत ते पाठपुरावा करायचे. ते शहराध्यक्ष झाले आणि कामाचा विस्तार वाढला. त्यांच्या अध्यक्षतेखालीच महापालिकेत प्रचंड मोठा विजय आम्ही प्राप्त करू शकलो. त्यांनी सातत्याने लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीच प्रयत्न केला.  तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते ऍम्ब्युलन्समधून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले.

भाऊ म्हणजे अजब रसायन होते. जिद्दीमुळेच ते दुर्धर आजाराशी संघर्ष करू शकले. जमिनीशी, लोकांशी जोडलेले व्यक्तीमत्व होते. स्वयंभू माणसे निघून गेले की समाजाची हानी होते. पण त्यांच्याकडून प्रेरणाही मिळत असते. आमच्या व्यक्तिगत जीवनात त्यांची नेहमी आठवण राहिल. भंडारा डोंगरावर जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी मदत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत केली जाईल. त्याचप्रमाणे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने शहरात विधी (लॉ) महाविद्यालय सुरू केले जाईल. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव दिले जाईल. त्यांचे कार्य पुढे चालत राहावे यासाठी काही विचार आले तर त्याची अंमबजावणी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.”

“राजकारणापलीरकडचा आमचा संबंध होता. ते अजातशत्रू होते. सामान्य कुटुंबातला व्यक्तीने परिश्रम आणि जिद्द मनात बाळगून प्रगती केली. राजकारण आणि व्यवसायात आपली वेगळी छाप त्यांनी उमटवली. ते राजकारणापलीकडचे होते. जिद्द, तळमळ, इच्छाशक्ती असणारा चांगला मित्र गमावला.”

गिरीश महाजन (आरोग्य शिक्षण मंत्री)

“ते नेतेही होते आणि त्यांची भितीही वाटत नव्हती. कोणालाही वाटायचे त्यांच्याकडे जावे आणि काम सांगावे. सर्वांच्या मनात आहे की ते अजूनही आपल्यात असायला हवे होते. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांची निष्ठा पाहिली. त्यांच्यासारखी निष्ठा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

चंद्रकांत पाटील (पालकमंत्री पुणे जिल्हा)

“२३ व्या वर्षी नगरसेवक होऊन पुढे राजकीय कारकीर्द कायम ठेवणे हे कतृत्वामुळेच शक्य होते. लक्ष्मणभाऊ हे कतृत्वान नेते होते. त्यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. झाले बाहु, होतील बहु, या सम हा. त्यांच्या नावाने आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”

भाई जगताप (अध्यक्ष मुंबई काँग्रेस)

 “चांगले काम करणारा नेता या शहराने गमावला.एक राजकीय कार्यकर्ता कसा असावा हे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. विकासासाठी काम करताना कोणाला बरोबर घेतले पाहिजे, एखादे कार्य कशा पद्धतीने तडीला न्यावे, याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. शहरातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांच्या रुपाने हरवले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा, सहकार्य करणारा नेता लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या रुपाने हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.

श्रीरंग बारणे (खासदार मावळ लोकसभा)

हा केवळ जगताप परिवारावर झालेला आघात नसून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर झालेला हा आघात आहे. विरोधात काम करत असतानाही आम्हाला मदत करणारा नेता भाऊ होते. भाऊ ज्या आजाराने गेले, ती वेळ कोणावरही येऊ नये म्हणून त्यांच्या नावाने पिंपरी चिंचवड शहरात कॅन्सर हॉस्पिटल उभारावे.

मारुती भापकर

बोटाला बोट धरून मला भावाप्रमाणे मदत केली, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भाऊंनी या शहरात तयार केले. त्यांचे राहिलेले काम आपणा सर्वांकडून पूर्ण व्हावे हीच खरी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

आमदार आण्णा बनसोडे

आपले राजकीय विरोधक कोण आहेत, ते न पाहता त्यांचेही काम भाऊंनी केले. अपंगांना अनेक प्रकारे त्यांनी मदत केली.

मानव कांबळे (नागरी सुरक्षा हक्क समिती)

सामान्य माणसाला मोठ्या पदावर पोहचविण्याचे कार्य लक्ष्मण भाऊंनी केले, विकासात्मक कामाची जडणघडण भाऊंनी अवलंबवली

सचिन भोसले (शिवसेना बाळासाहेब ठाकरे)

भाऊंचे कर्तृत्व एवढे मोठे आहे, की त्यांच्या विषयीच्या भावना थोडक्यात मांडणे खूप कठीण आहे. भाऊंच्या संपर्कात जे जे आले त्यांना भाऊंनी मोठे केले.

अजित गव्हाणे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!