महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आठवड्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी १०.०० वा. सर्व प्रभाग कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.
जनसंवाद सभेत आज सुमारे ११३ नागरिकांनी अधिका-यांशी संवाद साधून आपल्या सूचना मांडल्या. या सभेद्वारे निर्णयाच्या अंमलबजावणीची कालमर्यादा आणि वेग याबद्दल नागरिकांनी महापालिका यंत्रणेविषयी समाधान व्यक्त केले. जनसंवाद सभेत दाखल झालेल्या सूचनांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांना देण्याची व्यवस्था करावी असे आदेश जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ यांच्या नियंत्रणाखाली आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे ११३ नागरिकांनी तक्रारी आणि सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे ११, १७, ५, १५, ९, ७, २६, आणि २३ नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
आज (दि.१८) कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात दर सोमवारी होणारी पाचवी जनसंवाद सभा पार पडली. अनेक तक्रारी असल्याने वेळेत जनसंवाद सभा सुरू होऊनही तब्बल सव्वा तीन तास जनसंवाद सभा सुरू होती. यावेळी क्षेत्रीय कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करून उपस्थित होते. मात्र तक्रारी अर्ज फक्त २३ होते. यावेळी सर्वाधिक पाण्याच्या समस्यांच्या तक्रारी असल्याचे दिसून आले.
कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सकाळी दहा ते दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत सभा सुरू होती. या सभेला मुख्य समन्वय अधिकारी म्हणून अध्यक्षपदी सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात स्थापत्य अभियंता विजयसिंह भोसले, स्मार्ट सिटी अधिकारी मनोज सेठिया, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत मोरे आदी कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जलपर्णी, कचरा घंटा गाडी, गतिरोधक बसविणे, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर स्वच्छता करणे आदी समस्या लेखी तक्रारी अर्ज स्वीकारून निवारण करण्यात येत होते.
यावेळी मात्र दिवसाआड होत असलेल्य अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी असल्याचे दिसून आले. फुगेवाडीतील केशव माधव सोसायटी तसेच दापोडी येथे अपुरा होणारा पाणीपुरवठा यामुळे अनेक नागरिकांचा संताप दिसून आला. कासारवाडी येथील शास्त्री नगर, गुलीस्तान नगर, हिराबाई नगर येथील पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने महिलांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील परिसरातील महिलांनी एकत्रित येऊन जणू काही मोर्चाच जनसंवाद सभेमध्ये आणला होता. यावेळी काही मोजक्याच महिलांना जनसंवाद सभेमध्ये एकाच वेळी सोडण्यात आले होते.
🔴जनसंवाद नक्की कोणासाठी ?
यावेळी जनसंवाद सभेला माजी नगरसेवक, नगरसेविका, इच्छुक उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील गर्दी केली होती. खरे तर जनसंवाद नक्की कोणासाठी ? हे महानगरपालिकेने स्पष्ट करावे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून आहे की सार्वजनिक तक्रारी घेऊन येणाऱ्यांसाठी आहे. हेच समजत नाही. अधिकारी देखील सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. मात्र नगरसेवकांच्या तक्रारींच्या समस्या मात्र जास्तीत जास्त वेळ देऊन सविस्तर ऐकून समोरासमोर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारींचे निवारण करीत असल्याचे दिसून येत आहे.
घरकुल मध्ये लक्की ड्रॉ मध्ये भरलेले पैसे परत मिळावेत अशी मागणी कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे राहणाऱ्या एका जेष्ठ (विमल शहा) महिलेने केली. यावेळी रडतरडत आपली माहिती आणि परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर लक्षात आणून दिली. अधिकाऱ्यांनी देखील त्यांची माहिती ऐकून घेऊन सविस्तर उत्तर दिले. परंतु त्यांचे उत्तराने या ज्येष्ठ महिलेचे समाधान झाले नाही. असे दिसून आले.
———————————————-
कचरा प्रश्न, गार्डन मधील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून दुरुस्ती करावी. रस्त्याची कामे चालू आहेत त्याठिकाणचे धोकादायक मटेरियल काढून घ्यावे. संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्रासमोर गतिरोधक बसवावेत, ते नियमानुसार असावेत.
(सुजाता पलांडे, माजी नगरसेविका)
———————————————-
मनपाच्या भूमी जिंदगीच्या माध्यमातून भाड्याने घेतलेल्या गाळाधारकांच्या तक्रार बाबत सदर विभाग दखल घेत नसल्याची तक्रार केली असता संजय कुलकर्णी यांनी त्वरित दखल घेऊन माझ्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.
(कांतीलाल खिवंसरा, नागरिक)
———————————————-
कासारवाडी येथील भुयारी मार्ग मधील प्लास्टरचे पापुद्रे दिवसेंदिवस निखळत चालले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहतुकीला निर्माण होऊ शकतो. याची त्वरित दखल घेण्यात यावी.
(किरण खाटेकर, नागरिक)
———————————————-
जुनी सांगवी येथील कचरा समस्या सोडविण्यासाठी मी अधिकाऱ्यांना दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) घंटा गाडी परिसरात उपलब्ध करून देण्याची तक्रार केली. यावेळी अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतली आहे.
( राजू सावळे, मनसे)
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…