महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ उडाल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शरिरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दापोडी-बोपोडी रस्त्यावरील बुद्धविहार परिसरालगत असलेल्या दापोडी स्मशानभूमी रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.
शहरात अनेक ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसामुळे रस्त्याची दैना झाली आहे. रस्ता कामे करीत असताना मापाचे तारतम्य न बाळगल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. अशातच नागरिकांना अंत्यविधीसाठी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी दापोडी येथे होत आहे.

त्यातच अडचणीत भर म्हणून परिसरात भंगार मालाची दुकाने, अस्ताव्यस्त पसरलेला कचरा, त्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ व परिसरात नियमित होत नसलेली स्वच्छता यामुळे कचरा व गाळ रस्त्यावर जमा होतो. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अंत्ययात्रा काढावी लागते. गेली आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने येथे डास व कीटकांचा उपद्रव वाढला. पाणी ओसरल्यावर जमा झालेल्या गाळ व कचऱ्याची स्वच्छता होत नसल्याने आरोग्याचा धोका लक्षात घेऊन येथे नियमित स्वच्छता करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. शेजारीच बुद्धविहार प्रार्थनास्थळ, मुख्य रस्त्यावर विविध दुकाने, हॉटेल आहेत.
रस्त्याला व्यवस्थित उतार नाही. यामुळे येथील पाण्याचा निचरा होत नाही. रस्ता करताना या गोष्टींकडे लक्ष दिले गेले नाही. – मनोज परदेशी, स्थानिक रहिवासी