महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
परंतु या सगळ्यात सर्वात लक्ष महाराष्ट्र मतदारसंघाने वेधले आहे. कारण या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरोध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळेच आपल्या कन्येच्या विजयासाठी शरद पवार यांनी फिल्डींग लावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळेच शरद पवार गटाच्या बाजूने सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाच्या बाजूने सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिले आहेत. यात दोन्ही गट बारामतीत विजयासाठी प्रचार सभा घेताना दिसत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी आपल्या विश्वासू सरदारांना मैदानात उतरवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एक दिवस बाकी असताना शरद पवार यांनी घरातील विश्वासू लोकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोणाकडे कोणती जबाबदारी??
म्हणजेच की, शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातील बूथ केंद्रांची जबाबदारी परिवारातील लोकांमध्ये वाटून दिली आहे. त्यानुसार, भोर, वेल्हा, मुळशीची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर सोपवली आहे. तर पुरंदरची जबाबदारी सुनंदा पवार आणि संजय जगताप यांच्यावर सोपवली आहे. तसेच, इंदापूरची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपवली आहे. त्याचबरोबर, बारामतीतील कामगिरी श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार पाहणार आहेत. सचिन दोडके यांच्याकडे खडकवासला बूथ देण्यात आला आहे. तर दौंडची जबाबदारी नामदेव ताकवने यांच्यावर दिली आहे.
दरम्यान, 7 मे रोजी बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावर्षी 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्याकरिता 13 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या बारामती, पुणे, मावळ ,शिरूर मतदारसंघातील आठवडे बाजार बंद राहणार आहे.