महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : राज्याच्या राजकीय वर्तुळातून अतिशय महत्वाची घडामोडी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता अॅक्शन मोडवर आले असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.
आमदार अपात्रता कारवाईला वेग आल्याने शिंदे गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे. येत्या एक ते दोन दिवसात राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे.
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला पर्याय असणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे.
शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.