महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून): महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. सदर सभा तब्बल साडे तीन तास सुरू होती. यावेळी मुख्य समन्वयक यांच्या अनुपस्थितीतच जनसंवाद सभा पार पडली. सभेत क्षेत्रीय अधिकारी यांनीच नागरिकांच्या तक्रारी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. त्यावेळी अनेक नागरिकांनी कामे वेळेवर होत नसल्याने वाद घातले, त्यामुळे सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे तसेच आचार संहिता लागू झाल्यामुळे जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली नव्हती. याआधी ११ मार्च रोजी जनसंवाद सभा पार पडली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. सभेत एकूण १३ तक्रारी मांडण्यात आल्या. पावसाळा सुरू झाल्याने सर्वाधिक तक्रारी ड्रेनेज, स्थापत्य, अतिक्रमण या विभागाशी संबंधित होते.
![Google Ad](https://maharashtra14news.com/wp-content/uploads/2023/10/photo_2023-10-18_23-28-39-1.jpg)
यावेळी क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता स्थापत्य सतीश वाघमारे, उपअभियंता विद्युत संदीप जाधव, उपअभियंता जलनि:सारण शोएब शेख, उपअभियंता पाणीपुरवठा चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता अतिक्रमण संदीप हजारे, उपअभियंता सुनील दांगडे, जयकुमार गुजर, प्रशांत कोतकर, चंद्रकांत मुठाळ, महेंद्र देवरे, शाम भंडारी जनसंवाद सभेत उपस्थित होते. सभेत जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी, संततुकाराम नगर या भागातील तक्रारदार उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी जनसंवाद सभेत तक्रारी करूनही त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने अनेक नागरिकांनी आर्त हाकेने क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमोर तक्रारींचे निरसन करण्यासाठी दाद मागितली. त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. असा पवित्रा काहींनी घेतल्याचे पहायला मिळाले, संत तुकाराम नगर येथील म्हाडा मधील नागरिक गुरुप्रसाद बर्वे, विशाल कांबळे, जावेद शेख, रेश्मा देवडे यांनी हद्दीतील गाळे धारकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार मागील जनसंवाद सभेत केली होती. मात्र त्यावर अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. अतिक्रमणामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी क्षेत्रीय अधिकारी यांनी सभा संपताच यावर चर्चा करू असे सांगितले.
पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद तावरे यांनी पिंपळे गुरव त्रिमूर्ती कॉलनी येथील रस्त्याचे काम थांबल्याने ते सुरू करण्यात यावे ही मागणी केली. दापोडी येथील राजू बनसोडे तसेच महिला नागरिक एकत्रित येत परिसरात दाट वस्ती असल्याने चेंबर सतत तुंबत आहे. पावसामुळे गाळ साचला आहे. संबंधित अधिकारी फोन उचलत नाहीत. दोन दिवसात गाळ काढला नाही तर मी स्वतः गाळ काढून पालिकेत जाऊन आयुक्तांसमोर ठेवेल.
राजू सावळे म्हणाले की, पिं.चिं.मनपाने शहरात स्मार्ट सिटीचे प्रोजेकट राबवले आहेत अशा कामांना स्मार्ट सिटी म्हणायचे का…? काम चालू असताना अधिकारी साईडवर फिरकत नाहीत असलेल्या त्रुटी सांगितल्या तरीही याची अमंहलबजावणी होतच नाहीत याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
मनसेचे राजू सावळे यांनी जुनी सांगवी चंद्रमनी नगर (राधा नगर) दापोडीला जाणारा मुख्य रस्ता …मनसेने पाठपुरावा करून एक महिण्यापुर्वीच रस्ता पुर्ण झाला मनपाने स्थापत्य विभागाने याठिकाणी पावसाळी नविन लाईन टाकली मग ….? पुन्हा तोच प्रश्न नागरिकांच्या घरात पाणी कसे जाते कसे रस्त्यात दोन फुटाने पाणी साठतेच कसे ?सर्व ठेकेदारांमार्फत कामे केली जातात पण यांचेवर अंकुश मात्र अधिकाऱ्यांचा अजिबातच नाही ठेकेदार पोसण्याचे काम चालू आहे असे यावरून लक्षात येत आहे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करण्याचे काम होत आहे , असे सांगितले.
तसेच संत तुकाराम नगर येथील सुजाता पालांडे यांनी अधिकाऱ्यांसमोर आमचा परिसर वाळीत टाकला आहे का? कामे करायचीच नाहीत का? का दूजाभाव केला जात आहे असे धारेवर धरत तक्रार करण्यात आली. यावेळी तक्रारदारांचे म्हणणे समजून घेत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्वरित तक्रारींचे निरसन करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी ड्रेनेज विभागाच्या तक्रारी गंभीर स्वरूपात आल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सभा संपताच ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तंबी दिली.