Categories: Uncategorized

अवयवदान म्हणजे नवा जन्मच – आपटेकाका

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २९ नोव्हेंबर २०२३ :- पुनर्जन्म कोणी पाहिला नाही पण अवयवदानाने याच जन्मात पुन्हा एकदा जन्म घेता येतो, किंबहुना तो पुनर्जन्मच असतो. एक व्यक्ती अवयवदान करून इतरांना जीवनदान देऊ शकते. यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात एक नवी सकाळ होऊ शकते, असा विचार अवयव प्रत्यारोपन अधिकृतता समितीचे राज्यसदस्य आपटेकाका उर्फ श्रीकांत आपटे यांनी मांडला.

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवयवदान व प्रत्यारोपन यावर आधारित ‘पुन्हा फिरून जन्मेन मी’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आपटेकाका बोलत होते.

या व्याख्यानादरम्यान आपटेकाका यांनी देहदान आणि अवयवदान यातील फरक उपस्थितांना समजावून सांगितला. तसेच मृत्यु दोन प्रकारचा असून मृत्युच्या कारणांवरुन अवयवदानाची आणि देहदानाची पात्रता ठरवता येते असेही ते यावेळी म्हणाले. याव्यतिरिक्त अवयवदानाची पात्रता, कोणकोणते अवयव दान करता येतात, अवयवदानाचे प्रमाणपत्र कोठे मिळते, दान देण्यात आलेल्या अवयवांचे वितरण कसे करता येते अशा विविध विषयांवर तसेच याबाबत असलेल्या कायद्याची माहितीचे सविस्तर मार्गदर्शन आपटेकाका यांनी  केले.

मृत्युची कारणे पाहून देह शीतगृहात ठेवता येऊ शकतो आणि त्यानंतर त्या देहाचा उपयोग वैद्यकीय प्रशिक्षण व संशोधनासाठीही करता येतो, असे डॉ. अरूण हळबे म्हणाले. तसेच देहदान कोण करू शकतो, ते कोठे स्विकारले जाते, त्यासाठी डॉक्टरांच्या कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते, ते किती कालावधीत करता येते याबद्दलही डॉ. अरूण हळबे यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. रोहिणी आठवले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नेत्रदान व त्वचादान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर भावासाठी यकृतदान करून त्याला जीवनदान देणाऱ्या संगीता नायक यांनी त्यांचा अवयवदानाचा अनुभव कथन केला.

सायली अष्टेकर यांनी त्यांच्या मुलीला किडनी प्रत्यारोपनासाठी आलेल्या अडचणी सांगितल्या आणि अवयवदानामुळे त्यांची मुलगी मृत्युच्या दारातून कशी परत आली याबद्दलचा भावनिक अनुभव सांगितला. त्यानंतर नरेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या मुलाच्या यकृतदानाच्या आठवणी सांगितल्या तर मृत्युंजय फाऊंडेशनचे अवयवदान प्रबोधनासाठी पदयात्रेचा किर्तीमान प्रस्थापित करणारे सुनील देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.

सायली लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या लता गजभिव यांनी अवयवदान हे किती श्रेष्ठदान आहे याबद्दल बोलताना त्यांनी स्वत:च्या मुलीच्या मृत्युची कहानी सांगितली. अवयवदान मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता असेही त्या म्हणाल्या. तसेच या सामाजिक कार्यात नि:संशयपणे हातभार लावण्याचे नागरिकांना आवाहन केले.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 days ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

5 days ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

3 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

4 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

4 weeks ago