महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जुलै) : टाळ – मृदंगाचा निनाद… ‘माऊली – तुकारामांचा अखंड जयघोष… विविध वाद्यांचा गजर… रांगोळीच्या पायघड्या व फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा बुधवारी (दि.१२) सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘श्रीं’ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले होते.

तर आषाढी वारीनंतर पंढरपूरहून देहूकडे निघालेला संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा पिंपरी येथे विसावला. यावेळी ठिकठिकाणी शहरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पालखीचे आगमन आंबेडकर चौकाजवळील हॉटेल गोकूळ येथे पोहोचला. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत केले.
माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून “सर्व सुख गोडी साही शास्रे निवडी” या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरु असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माऊलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माऊलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक, श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर, हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणामंडपात पालखी स्थिरावली.
माउलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे तसेच शहरातील अन्य शाळांमधील विद्यार्थी तसेच भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर धाकट्या पादुका विसाव्यावर प्रकाश काळे यांनी पालखीचे स्वागत केले. त्याठिकाणी पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. शहरात विविध वाद्यांच्या स्वरात माउलींच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.
PALAASH INSTITUTE PRESENTS FREE AYURVEDIC COSMETIC WORKSHOP ON 16TH JULY SUNDAY