महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकसक मे. ओम साई कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने डॉ आंबेडकर नगर नेहरू नगर पिंपरी या झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा चावी वाटप कार्यक्रम” राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेल्या पंचशील बुद्धविहार ““ पंचशील बुद्धविहार उद्घाटन व बुद्धमूर्ती स्थापना ” करण्यात आली.
यावेळी बोलताना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त हा सोहळा आज संपन्न झाला याचा खरोखरच आनंद वाटतोय आदरणीय लक्ष्मणभाऊंनी झोपडपट्टीधारक, श्रमिक, मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसाच्या संपन्न आणि सुरक्षित जीवनासाठी अखंड कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपण या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नव्या स्वप्नांना पंख देण्याचे स्वप्न साकारत आहोत.आज अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले. स्वतःची ओळख असलेलं घर – जिथे आपली मुले सुरक्षित वाढतील, जिथे भविष्य नव्या आशेने उजळेल, आणि जिथे आपलं सुख, समाधान आणि अभिमान असेल. आज तुम्हाला मिळणारी ही चावी केवळ घराची चावी नाही, तर आत्मनिर्भरतेची, सन्मानाची आणि उज्ज्वल भविष्यातील दार उघडणारी चावी आहे.अशी भावना यावेळी व्यक्त केली.

या योजनेच्या यशामागे मे. ओम साई कन्स्ट्रक्शन, झोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य अधिकारी श्री.निलेशजी गटणे, मा.महापौर श्री.हनुमंतराव भोसले, डॉ.वैशाली ताई घोडेकर, श्री.राहुलजी भोसले त्याच बरोबर संपूर्ण SRA टीम यांनी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल आमदार शंकर जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी मा.आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, मा.नगरसेवक पुणे मनपा श्री.विजय अप्पा रेणुसे, ओम साई कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री.विजुशेठ जगताप, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.नामदेवजी ढाके, श्री.विलासजी मडीगेरी, मा.नगरसेवक श्री.सिद्धेश्वर बारणे, श्री.गणेश कस्पटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, आदरणीय भाऊंच्या कार्याचा वारसा पुढे नेणे त्याचबरोबर त्यांनी समाजासाठी ज्या विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल.