महाराष्ट्र 14 न्यूज, दि.14 ऑगस्ट : सोमेश्वर कारखान्याने २०२५-२६ या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी तब्बल ३८०० रूपये प्रतिटन असा महाराष्ट्राच्या साखरउद्योगाच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च अंतिम दर आज जाहीर केला.
ही रक्कम एफआरपीपेक्षा ५१५ रूपये अधिक आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्यांचा ऊस तुटलाय अशा शेतकऱ्यांना तर अनुदानासह ३९०० व ४००० रूपये प्रतिटन असा विक्रमी दर मिळणार आहे.

सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताळेबंदानुसार ३८०० रूपये प्रतिटन असा अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने सोमेश्वरने स्वतःचा २०२३-२४ हंगामाचा ३५७१ रूपये प्रतिटनाचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच ‘सोमेश्वर’ने सलग नवव्या वर्षी तीन हजारांपेक्षा अधिकचा दर दिला आहे.
सोमेश्वरची एफआरपी प्रतिटन ३२८५ रूपये असून शेतकऱ्यांना पहिली उचल ३३०० रूपये अदा करण्यात आलेले आहेत. आता उर्वरीत प्रतिटन ५०० रूपये दिवाळीपूर्वी मिळणार असून सभासदांची दिवाळी खात्रीने गोड होणार असल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोल्हापूरच्या ‘भोगावती’ने ३६५३ रूपये (२०२५-२६) तर ‘माळेगाव’ने ३६३६ रूपये (२०२३-२४) प्रतिटन असे सर्वोच्च दर दिले होते. कोल्हापूर, सांगलीतील कारखान्यांपेक्षा अर्धा ते एक टक्का साखर उतारा कमी असताना सोमेश्वरने बाजी मारली आहे.
सर्वोच्च दराची ही कारणे –
- मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल स्टॉपेजेस ०.०६ टक्के
- उत्तम लागवड व तोडणी नियोजन
- गाळपक्षमतेचा १११ टक्के वापर
- साखर उत्पादन खर्च आणि एकूण उत्पादन खर्च माफक
- कर्जांवरील व्याजखर्चावर नियंत्रण
- शेतकऱ्यांकडून दर्जेदार उसपुरवठा
- उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता














