महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २९ डिसेंबर २०२२ :- महापालिकेच्या वतीने शून्य कचरा उपक्रमांतर्गत भोसरी येथील गवळीमाथा झोपडपट्टीमधील दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प महिला बचत गटातील महिलांच्या सहकार्याने यशस्वी केला आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
परिसरामध्ये निर्माण झालेला कचरा त्याच ठिकाणी अथवा परिसरामध्ये जिरवणे, विल्हेवाट लावणे किंवा त्यापासून खतनिर्मिती करणे अशी शून्य कचरा संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित महापालिकेच्या वतीने शून्य कचरा उपक्रमाच्या अंतर्गत क प्रभागामध्ये भोसरीमधील गवळीमाथा झोपडपट्टीतील घरांमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचा प्रकल्प महिला बचत गटातील महिलांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यानात सुरु केला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला आज भेट देऊन ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या खताची तसेच प्रक्रियेची पाहणी केली. त्यावेळी ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या खताची पहिली पिशवी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरुपात सुपूर्द केली. त्यावेळी उपस्थित महिला बचत गटातील महिलांसोबत संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी उपआयुक्त अजय चारठाणकर, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्याधिकारी तानाजी दाते, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी यांच्यासह आरोग्य निरीक्षक, महापालिका कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे प्रतिनिधी तसेच महिला बचत गटांतील महिला उपस्थित होत्या.
आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पासाठी काम करण्याऱ्या महिलांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या परीश्रमाचे कौतुक देखील केले. आयुक्त सिंह म्हणाले, शून्य कचरा संकल्पनेवर आधारित असलेला हा प्रकल्प स्तुत्य व महत्वाकांक्षी असून या माध्यमातून मिशन शून्य कचरा संकल्पनेला प्रोत्साहन मिळत आहे तसेच या भागात राहणाऱ्या गरजू महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. गवळीमाथा झोपडपट्टी ही शून्य कचरा उपक्रम यशस्वी पद्धतीने राबविणारी पहिली झोपडपट्टी असून याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या खताचा दर्जा उत्तम असून त्याचा वापर उद्यानांतील वृक्ष संवर्धनासाठी करण्यात यावा, असे देखील त्यांनी यावेळी सुचवले. महिलांनी स्वावलंबी व्हावे तसेच गरजू महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळे रोजगारभिमुख कोर्सेस राबविण्यात येत आहेत. याचा देखील लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन देखील आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
बचत गटांतील महिलांनी आयुक्त यांचेशी संवाद साधताना ‘हा उपक्रम सुरु करताना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कचऱ्याचे काम कसे करायचे असा संकोच आमच्या मनात होता. तसेच कुटुंबियांचा देखील अशा कामास विरोध होता. हळूहळू सुरुवात झाली आणि काम देखील आवडायला लागले. कचरा विलगीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचे कामही आम्ही करतो. या माध्यमातून आम्हाला रोजगार उपलब्ध झाला आणि आम्ही स्वावलंबी झालो. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी आम्ही देखील सक्षम आहोत असा आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला आहे. महापालिकेचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असते, अशा भावना व्यक्त केल्या.
गवळीमाथा झोपडपट्टी मध्ये एकूण कुटुंब संख्या ३७४ असून सुमारे ६३७ किलोग्रॅम एवढा दैनंदिन निर्माण होतो. त्यातील ओला कचरा ३५८ किलो आणि सुका कचरा २७९ किलो निर्माण होत असून त्यामधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. शून्य कचरा उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील पहिली झोपडपट्टी ठरली आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन आणि महिलांचे स्वावलंबन घडवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…