महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जुन) : राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात.
म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवाराने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात.
म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते पहिली मोजली जातील. (महाविकास आघाडीची तज्ज्ञांची कमिटी तयार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती ठरली) एकीकडे 42 मतांचा कोटाही गाठायचाय आणि दुसरीकडं दुसऱ्या पसंतीची मते आपल्याच उमेदवाराची मोजली जावीत, याकरता अगोदरच्या उमेदवारांना 42 पेक्षा जास्त मतेही द्यायची आहेत. म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीला अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.