महाराष्ट्र 14 न्यूज : सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणात सरकारच्या गृहखात्याच्या गैरकारभार सभागृहाच्या पटलावर पुराव्यानिशी ठेवल्या पासून सत्ताधाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. काल सभागृहाच्या कामकाजात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे नावाच्या क्राईम ब्रँचमधील पोलीस अधिकार्याच्या तात्काळ निलंबनाची मागणी रेटून लावल्यानंतर सचिन वाझे हे नाव आणखीनच चर्चेत आलेलं आहे. कारण सरकार जरी हे प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्न करत असले तरी देवेंद्र फडणवीसांनी मात्र विधानसभेत थेट पुरावे देत गृहमंत्र्यांची बनवाबनवी चव्हाट्यावर आणली आहे. पण हे सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण? त्यांचा या मनसुख हिरेन प्रकरणाशी काय संबंध आहे? सरकार का त्यांना वाचविण्यासाठी आपली अब्रू सुद्धा घालवायला तयार आहे? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेला पडले आहेत.
तर सचिन वाझे यांच पूर्ण नाव सचिन हिंदुराव वाझे. ते मूळचे कोल्हापूरचे. १९९० साली पोलीस दलात सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी बराच काळ एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश केला व निवडणूकही लढवली) यांच्या टीममध्ये काम केलं. अंदाजे ६३ एन्काऊंटर्समध्ये सचिन वाझे यांचा सहभाग होता. सचिन वाझे यांची कारकीर्द कायम वादाच्या भोवऱ्यात अडकून राहिली.
२००४ साली ख्वाजा युनूज कस्टडीयल डेथ प्रकरणात न्यायालयाने वाझेंना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २००८ साली वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४-२०१९ साली सचिन वाझेंना सेवेत घेण्याची मागणी तत्कालीन सत्ताधार्यांपैकी एका मित्रपक्षाने उचलून धरली. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे अवमूल्यन करून त्यांना पुन्हा सेवेत घेणे बेकायदेशीर असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली. २०२० साली सत्तांतर होताच थातुरमातुर कमिटी स्थापन करून “कोविडचे” कारण देत राज्य सरकारने सचिन वाझे यांना पुन्हा बेकायदेशीरपणे सेवेत रुजू केले. त्यांनतर ४ नोव्हेंबर २०२० साली “अन्वय नाईक” प्रकरणात रिपब्लिकन नेटवर्कचे अर्णव गोस्वामी यांना घरात घुसून अटक केल्याप्रकरणी सचिन वाझे हे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.पोलीस खात्यात काम करताना जनतेची सेवा करण्याऐवजी राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन काम करणे यासाठी वाझे डिपार्टमेंटमध्ये कुप्रसिद्ध आहेत.
मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझे हे पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले. कारण सदर प्रकरणात स्थानिक पोलीस पोचण्यापूर्वीच वाझे घटनास्थळी पोचले होते. त्यानंतर “योगायोगाने” त्यांची नियुक्ती सदर प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून झाली होती. आठवडाभर या प्रकरणात “जीव ओतून” काम केल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास हा एसीपी अंकुरे यांच्याकडे देण्यात आला. सारं काही सुरळीत सुरू होत. परंतु अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने व हिरेन आणि सचिन वाझे यांचे पूर्वीपासूनचे संबंध असल्याचे सिद्ध करणारे कॉल रेकॉर्ड्स म्हणजेच सिडीआर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी थेट सभागृहात मांडल्याने सगळीकडे खळबळ उडाली.
कारण मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत आपल्या पतीची हत्या झाली व त्यात सचिन वाझेंचाच हात असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. याशिवाय मृत हिरेन यांची स्कॉर्पिओ ही चार महिन्यांपासून सचिन वाझेंच्याच ताब्यात होती आणि त्यांच्या मृत्यच्या अगोदर आणि नंतरचे लोकेशन यासंबंधी फडणवीसांनी खुलासा करत या प्रकरणात सचिन वाझे आणि गावडे या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा थेट संबंध असल्याचे थेट पुरावेच सभागृहात सादर केले. त्यामुळे वाझेंना वाचवू पाहणाऱ्या सरकारचे पितळ जनतेसमोरच उघडे पडले आणि उत्तर देता देता गृहमंत्र्यांची त्रेधातिरपीट उडाली.
त्यामुळे विरोधी पक्षनेत्याने एवढे ढळढळीत पुरावे सरकारला दिले असताना एका संशयित आरोपीला वाचविण्यासाठी सरकार इतकी धडपड का करते आहे? गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझेंचे निलंबन का थांबविले गेले? सरकारवर नेमका कुणाचा दबाव आहे? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या मनात आहे. त्यामुळे या “वाझेंचे” ओझे नक्की कुणाच्या खांद्यावर आहे ?
18 Comments