महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : आज मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी सावरकर, नेहरू वादावरून देखील सुनावलं आहे.
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असताना त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाला. सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हटलं राज ठाकरे यांनी? गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यावरून राज ठाकरे यांनी चांगलंच सुणावलं आहे. महापुराषांची बदनामी करणं थांबवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? असा सवाल करतानाच दयेचा अर्ज ही सावरकारांची रणनीती होती. सावरकरांनी जेवढा त्रास भोगला तो इतर कोणीही भोगला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेहरुंवर टीका करणाऱ्यांना फटकारले दरम्यान यावेळी नेहरुंवर टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी फटकारलं आहे.
जाणून बूजून नेहरुंच्या गालाचा मुका घेणाऱ्या तरुणीचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. त्या फोटोवरून नेहरुंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी नेहरू यांच्या घराण्यातील होती. ती पंडित नेहरू यांची नात होती असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
राज ठाकरे यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे काही गोष्टी मुद्दामहून सांगण आवश्यक आहे. मनसेची स्थापना करून 16-17 वर्ष झाली. या काळात ज्या भूमिका घेतल्या, आंदोलनं केली, त्याचा यशस्वी होण्याचा रेट काढला तर इतर पक्षांच्या आंदोलनापेक्षा जास्त असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 16 वर्षात केलेल्या आणि यशस्वी झालेल्या आंदोलनाची पुस्तिका काढणार आहे.
रेल्वेचं आंदोलन असेल, महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्यासाठी आंदोलन असेल. युपी बिहारविरोधातील आंदोलन असेल, टोलनाके बंद करण्यासाठीचं आंदोलन असेल या सर्व विषयात मनसेची भूमिका स्पष्ट होती. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला. आपलं वय काय? आपण बोलतो काय? पदाचा मान ठेवतो म्हणून बोलत नाही, नाहीतर महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.