महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यालयाच्या उद्घाटनाला जाऊन मी फक्त फित कापणार असं अजित पवार सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. याशिवाय कार्यक्रमातील गर्दीवरुन अनेकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार कार्यक्रमास्थळी थांबून सत्कार स्वीकारत होते. भाजपकडून या प्रकरणावरुन सडकून टीक करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी गर्दीवर नाराजी व्यक्त केली.
अजित पवार गर्दीवर नेमकं काय म्हणाले?
“मला प्रशांतने 10 तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी 7 वाजतादेखील उड्डामपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती”, असा दावा अजित पवार यांनी केला.
गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.
13 Comments