महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २५ सप्टेंबर) : पिंपळे निलख येथे बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रक्षक चौक ते पिंपळे निलख या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत, पावसामुळे रस्ता उखडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले असल्याने या रस्त्यावर सतत वाहनांची मोठी वर्दळ असते, येथे एक महिन्यापुर्वी नागरिकांच्या तक्रारीवरून प्रशासनाने डांबरीकरण करून खड्डे बुजविले, त्याला एक महिना होतो ना होतो पुन्हा झालेल्या पावसाने डांबरीकरण केलेले डांबर वाहने जाऊन उखडले गेले व पुन्हा खड्डे उघड्यावर आले.
हे काम तकलादू पध्दतीने केले असून येथे ठेकेदाराने निव्वळ महानगरपालिकेची फसवणूक केली आहे, पंरतू महानगरपालिकेला त्याचे काही सोयरसुतक नाही, तसेच येथील बापूजी बुवा चौक हा अपघाती झालेला आहे येथून कोण कधी कसा वळेल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पंरतू महानगरपालिका लक्ष देत नाही आणि लोकप्रतिनीधींना कोणत्याही परिस्थितित निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे दहीहंडी, गणशोउत्सव
आता नवरात्र उत्सव, दांडिया प्रशिक्षण यातूनच वेळ नाही,
तेंव्हा येथील खड्डे कधी बूजणार? असा प्रश्न येथील वाहनचालक विचारीत आहे.
दरम्यान ठेकेदाराने रस्त्यावरील खड्डे बुजविले की, मस्करी केली असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला. रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी का केली नाही, त्यांची जबाबदारी नाही का, ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असा संतप्त सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांनी उपस्थित केला.