महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ डिसेंबर) : राज्यात यापुढे वाहतुकीचे नियम मोडणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण सरकारने नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली असून, आता राज्यभरातील विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडात वाढ करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत राज्याने दंडाच्या वाढीची अधिसूचना जारी केली आहे, जी 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाली आहे.
दुचाकीवर हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास असलेल्या दंडात बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या वेळी 500 रुपयेच दंड असेल, परंतु दुसर्यांदा उल्लंघन केल्यास हा दंड 1,500 रुपये असेल. दुचाकीवरून तिघांनी एकत्र प्रवास केल्यास दंडाची रक्कम 200 रुपयांवरून थेट 1000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी धोकादायक/बेपर्वा वाहन चालवल्याबद्दल 1,000 रुपयांचा दंड होता. आता दुचाकीसाठी 1,000 आणि इतर वाहनांसाठी 2,000 रुपये दंड आकारला जाईल.
वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलण्याचा दंड 200 वरून 500 रुपये करण्यात आला आहे. हॉर्न वाजवल्यास दंड 500 वरून 1000 रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, फॅन्सी नंबर प्लेटसाठी 1,000 दंड होता, सुधारित दंड पहिल्या उल्लंघनासाठी 500 आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी 1500 रुपये आहे. अतिवेगात वाहन चालविल्यास 5000 रुपये आणि परमिटशिवाय गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाईल.
▶️नो-पार्किंगची समस्या
वाहनांची बेकायदेशीर पार्किंग ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. आता नो-पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करण्यासाठी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या वाढीव दंडामुळे लोक वाहतुकीचे नियम मोडण्यापासून परावृत्त होतील, असे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे. नो-पार्किंगसाठी केंद्र सरकारचा प्रस्तावित दंड 1000 रुपये आहे, पण राज्य सरकारने तो सध्या 500 रुपये मर्यादित केला आहे, जो पहिले 200 रुपये होता.
15 Comments