महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मार्च) : एकादशी निमित्ताने देवदर्शनाला जाणाऱ्या पंढरपूर आणि शेगावच्या भाविकांवर काळाचा घाला झाला आहे. एकीकडे सोलापूरात पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या भीषण अपघात झाला आहे.
यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ६ गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे शेगावला निघालेल्या भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. यामधील ४ भाविकांची प्रकृती गंभीर आहे.
आज वारकऱ्यांवर अंत्यसंस्कार होणार
तुळजापूरच्या कदमवाडीहून रात्री ८.३० ते ९.०० वाजण्याच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने एकादशीनिमित्ताने वारकरी निघाले होते. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळून मालट्रक भरधाव वेगाने जात होता. त्यावेळेस ट्रक वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जोरदार आदळला. यामध्ये ४ वारकरी जागीच ठार झाले आणि ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांमध्ये ३ पुरुष आणि महिलेचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मालट्रकचा डाव्या बाजूचा ट्रायर फुटल्यामुळे ट्रक ट्रॅक्टरवरती आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टर १०० ते २०० मीटर फरपडत गेला आणि जागेवरती पलटी झाल्यामुळे २२ वारकरी जागीच कोसळले. या भीषण अपघातामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू तर ६ जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर अखिल भारतीय वारकरी मंडळाने ट्रक चालकावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान आज दुपारी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांवर अंत्यसंस्कार होण्याची माहिती मिळतेय.
दोन महिन्यात खामगाव-जालना महामार्गावर चौथ्यांदा अपघात
एकादशी असल्यानिमित्ताने जालना जिल्ह्यातील अंबर तालुक्यातील रोगनवाडी येथील १२ भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावकडे निघाले होते. पण खामगाव-जालना महामार्गावर समोरुन येणाऱ्या ट्रकची जबरदस्त धडक भाविकांच्या बुलेरोला गाडीला झाली. या अपघातात ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ७ भाविक जखमी झालेत. यामधील ४ भाविक गंभीर जखमी असून त्यांच्यावर जालना आणि देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच ठिकाणी दोन महिन्यात हा चौथा अपघात असल्याचे नागरिक सांगत आहेत.