महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मार्च) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवार, २२ मार्च रोजी लोकसभेत बोलताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर आता ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. जर दुसरा टोल आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी लोकसभेत दिली.
टोलनाक्याजवळ राहणाऱ्या स्थानिकांसाठी टोलमध्ये सूट देण्यात येणार आहे. आधार कार्ड दाखवून स्थानिकांना पास देण्यात येईल आणि हा पास दाखवून स्थानिकांना टोलमधून सूट मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
“देशातील अनेक ठिकाणी ६० किमी अंतराच्या आत टोल आहे. हे चुकीचं आहे. पण पैसे मिळतात त्यामुळे आपल्या खात्याकडून यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, आता मी या सभागृहाला आश्वासन देतो की, देशात असे जे ६० किमी अंतराच्या आतील टोल असतील ते येत्या तीन महिन्यांमध्ये बंद केले जातील,” असे नितिन गडकरी म्हणाले.
महिला प्रवाशांसाठी रस्त्यांलगत पुरेशा सोयी नाहीत. त्यामुळे दर ४० किलोमीटर अंतरावर महिलांसाठी प्रसाधनगृह, स्तनपानासाठी विशेष खोली आदी सोयी देण्यात येणार आहेत. पुढील एका वर्षात या सोयी उपलब्ध होतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.