महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ सप्टेंबर० : शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेना फुटल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेनं मुंबई पालिकेकडे सर्वात आधी अर्ज केला आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार, शिवसेनेला परवानगी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, शिवतीर्थ हा मुंबई उच्च न्यायालयााने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, वर्षातून 45 दिवसच शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी आहे. या 45 दिवसांपैकी 9 सभा घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे. तर उर्वरीत 36 अधिकार हे मुंबई पालिका देत असते. राज्य सरकारकडे ज्या 9 परवानगी देण्याचे अधिकार आहे, त्यामुळे दसरा मेळावा येत नाही.;त्यामुळे दसरा मेळाव्याला परवानगी देण्याचा अधिकार हा मुंबई पालिकेला आहे. या निर्णयामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त काही कारणासाठी सूचना करू शकते.