महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिकांशी शुक्रवारी चर्चा केली. त्यात आयटी पार्कमध्ये गावठाणांच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याची स्थानिक ग्रामपंचाय़तींची मागणी त्यांनी मान्य केली. यामुळे आयटी पार्कमध्ये प्रस्तावित रस्ते रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची शुक्रवारी पहाटे पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यालयात आढावा बैठक घेतली. आयटी पार्कमधील हिंजवडी आणि ग्रामपंचायतींनी प्रस्तावित रस्ते रुंदी कमी ठेवावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर या गावांतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन गावठाणांच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याचे आश्वासन दिले. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी पीएमआरडीएला दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, चाकण औद्योगिक क्षेत्र परिसर आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यवसायिक, कामगार, वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तातडीने अरुंद असलेले रस्ते रुंद करण्यासाठी पावणे उचलणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा.


