महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : शैक्षणिक वर्ष 2020-21 पर्यंतच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात असले आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
▶️थेट पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश नियमात बदल
पदविका अभ्यासक्रम द्वितीय वर्षासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित / रसायनशास्त्र / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी/ जीवशास्त्र / इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट / अग्रिकल्चर/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/बिझनेस स्टडीज/ एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
▶️प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नाही
10 व 12 वीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना10 व 12 वीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
854 Comments