महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ जुलै) : गेल्या आठवडाभर शहर परिसरात जोरदार कोसळणाऱ्या वरून राजामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी आदी परिसरातून पवना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुगेवाडी येथील स्मशानभूमी व तेथील शौचालय कीर्तनकार यांची बैठक व्यवस्था असलेले आसन अक्षरशः पाण्याखाली गेले आहे. तर नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट पाण्याखाली गेला आहे. पिंपळे गुरव येथील गणपती विसर्जन घाटावरील हौद पाण्याखाली गेला आहे. मात्र पवना नदी दुथडी भरून वाहत असताना महापालिकेने येथील परिसरात धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक लावलेला दिसून आला नाही. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात येथील परिसरात नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असते. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सूचित करण्यात येते की नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नदीकाठावर, नदीपात्रात उतरून फोटो सेल्फी काढणे, पोहणे नदीपात्रात उतरणे धोक्याचे आहे. तरी याबाबत खबरदारी घ्यावी. अशा आशयाचा फलक दर्शनी भागावर प्रशासनाच्या वतीने नदी काठी लावण्यात येतो.
मात्र अजूनही नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन सुद्धा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने अद्यापपर्यंत सूचना फलक कुठेही लावलेला दिसून येत नाही. त्यामुळे अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नदीपात्रात या ना त्या कारणाने प्रवेश करीत आहेत. अशा उत्साही नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक काही काळ अशी मागणी होत आहे. नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नदीपात्रालागत अनेक झोपड्या, बैठी घरे, इमारती, सोसायट्या वसल्या आहेत. अशा लोकवस्तीमध्ये पाणी लवकर शिरते. त्यातच बांधकाम व्यवसायिकांनी नदीकाठी भराव टाकल्याने पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह लोकवस्तीमध्ये त्वरित शिरकाव करीत असतो. त्यामुळे येथे राहणाऱ्या रहिवाशांचा मोठा प्रश्न उद्भवत आहे.
शहरात सलग दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे येथील सखल भागात पाणी साचत आहे. तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे पाणी साचत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुसळधार पावसामुळे फुगेवाडी येथील स्मशानभूमी व तेथील शौचालय कीर्तनकार यांची बैठक व्यवस्था असलेले आसन अक्षरशः पाण्याखाली गेले आहे .
नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट पाण्याखाली गेला आहे .
*गुरुपौर्णिमा निमित्ताने*