महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक झालं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळं मत मांडलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही,’ अशी खोचक टीका राज यांनी केली आहे.
प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरे यांनी करोनाची परस्थिती उत्तम हाताळली, असं कौतुक सुरुवातीला झालं होतं. एका संस्थेनं देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीतही उद्धव यांचा समावेश केला होता. त्या अनुषंगानं विचारलं असता राज यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. ‘करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे. सरकारचे निर्बंध, टीव्हीवरील बातम्या आणि व्हाट्सअप वरील मेसेजेसमुळे यात भर पडत आहे. आजार गंभीर आहे. काळजी घेणं गरजेचं आहे, पण घरात बसून राहणंही योग्य नाही. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर सर्वकाही सुरळीत करायला हवं. किती काळ लोकांची फरफट करणार? असा सवालही त्यांनी केला. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘सरकारच्या कामाची पद्धतच कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची कुठलीही योजना सरकारकडं नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग-व्यवसाय बुडाले आहेत. अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. राज्यातील जनतेला असं वेठीस धरणं बरोबर नाही, असंही राज म्हणाले. ‘करोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती. पण सरकारमधल्या लोकांनी घराबाहेर पडणं आवश्यक होतं,’ असं ते म्हणाले.
30 Comments