महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : ज्या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. लटकेंच्या या विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, “कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो.
ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत. पुढे ते म्हणाले, “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही.
या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. “नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. फडणवीसांच्या या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांसमोर सर्व घडलं आहे.आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रात फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने पाहत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.