महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१६ एप्रिल) : दिवसा व्यापार केल्यानंतर बाजारातील त्याच जागी रात्रभर आपले सामान ठेवणाऱया फेरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. फेरीवाल्यांनो, बाजारात रात्रभर सामान ठेवण्याचा तुम्हाला हक्क नाही.
प्रशासनाने दिलेल्या वेळेत व्यापार करा आणि दिवस संपताच तेथील तुमचे बस्तान उठवा, असा सक्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
फेरीवाल्यांना ते व्यापार करीत असलेल्या जागेवर रात्रभर आपले सामान ठेवण्यास मुभा देण्यात यावी, अशी विनंती दिल्लीतील एका फेरीवाल्याने केली होती. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. याचिकाकर्त्याची विनंती खंडपीठाने फेटाळून लावली. याचवेळी फेरीवाल्यांना स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा डोस पाजला. फेरीवाल्यांना प्रशासनाच्या फेरीवाला धोरणानुसारच बाजारात व्यापार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यांना बाजारात रात्रभर आपले सामान ठेवण्याची मुभा मिळणार नाही. याबाबत ते हक्क सांगूच शकत नाहीत, असे न्यायालयाने निकाल देताना बजावले.
z याचिकाकर्ता दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमधील फेरीवाला आहे. त्याने सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने नवी दिल्ली पालिकेला निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली होती. तथापि, ही याचिका फेटाळली गेली. त्यानंतर फेरीवाल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालय म्हणाले…
z कोणत्याही फेरीवाल्याला फेरीवाला धोरणानुसारच बाजारात व्यापार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्या धोरणाच्या कक्षेबाहेर जाता येणार नाही.
z फेरीवाल्याची संपूर्ण संकल्पना अशी आहे की, फेरीवाला प्रशासनाने आखून दिलेल्या जागेत व्यापार करू शकतो. दिवसाची वेळ संपताच त्याने त्या जागेवरून आपले सामान उचलणे बंधनकारक आहे. व्यापार केलेल्या ठिकाणी संपूर्ण रात्रभर सामान ठेवण्यासाठी त्याला कुठलाही हक्क सांगता येणार नाही.