महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०मे) : राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला
राज्यात अद्यापही काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी म्हणजेच 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्येत घसरण होत आहे तेथील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
79 Comments