महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जुलै) : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते.
भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं.
तत्पूर्वी या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत श्रीलंकेची वरची फळी नेस्तनाबूत केली. पण कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
भारतीय फिरकीपटूंची कमाल
कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली होती. भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी झाला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार फलंदाज फिरकीपटूनीच बाद केले. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारतीय फलंदाजांसमोर लंकन गोलंदाच अपयशी
श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. सलामीवीर पृथ्वी शॉ (9 चौकारांच्या सहाय्याने 43 धावा) आणि इशान किशन (8 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावा) या दोघांनी लंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी 86 धावांची खेळी करत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला.
58 Comments