महाराष्ट्र 14 न्यूज : श्री अष्टविनायक दर्शन
“अष्टविनायक दर्शन आणि त्यांची महती” हे शिर्षक घेऊन तुम्हांला माहिती देत आहे. आज अष्टविनायकामधील दुसरा गणपती विषयी जाणून घेऊ..!
दुसरा गणपती :-
श्री सिद्धिविनायक ( सिद्धटेक )
मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ह्या गावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे.
श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून तीन फुट उंच आहे. मुर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास आहे कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.
आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होते तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतात, विष्णूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु ते त्या दैत्यांना मारू शकले नाही. तेव्हा त्यांनी युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.
सिद्धिविनायक मंदिराचे द्वार सकाळी ४ वाजता उघडले जाते. ४.३० ते ५ श्रींचे पूजन होते. सकाळी १० वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. ११ वाजता पंचामृती पूजा होते. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य दाखविला जातो. सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते. रात्री ८.३० ते ९.१५ यावेळात आरती केली जाते. त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद होते.
या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते. सोमवती अमावस्यासुद्धा साजरी केली जाते. विजयादशमीला येथे जत्रा भरते.
680 Comments