महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जुलै) : शिवसेना फुटल्याने महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते.
बहुमत चाचणीत देखील काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर राहिल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप आणि शिंदे गटाला झाला. त्यानंतर सोनिया गांधींनी या प्रकारावर अहवाल देखील मागविला.
या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पुढील निवडणुका महाविकास आघाडीच्या अंतर्गत लढल्या गेल्या पाहीजेत, हे माझे वैयक्तीत मत आहे. पण, आम्हाला आमचे मित्र पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेसोबत यावर चर्चा करावी लागेल, असे पवार म्हणाले. यावेळी पवारांनी आणखी एक महत्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविषयी आमच्या पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही.
पवार म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव शेवट्या वेळी तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॅबिनेटमध्ये आणला. त्याविषय़ी आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. हा सरकारचा प्रश्न नव्हता. हा मुख्यमंत्र्यांचा स्वत: चा निर्णय होता. औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी कोणतीच कार्यतत्परता दाखवली नाही. विधानपरिषदेच्या आमदारांच्या नियुक्त्या, विधानसभेच्या अध्याक्षांची रिक्त जागा आदी निर्णय आमच्या काळात प्रलंबित होते. पण, जसे काय एकदा भाजप-शिंदे गटाचे सरकार आले, त्यांनी लागलीच कार्यतत्परता दाखवत 2 दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले. असे यावेळी पवार म्हणाले.