महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर यशाचे श्रेय आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना जाते, असे वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केले. या विजयानंतर त्यांनी पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, तर चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी रात्री उशिरा जाऊन त्यांची भेट घेतली.
यावेळी लक्ष्मण भाऊंना भेटून आनंद झाला त्यांनी स्वतःची तब्येत, घर सोडून या विजयात मोलाचे योगदान दिले, म्हणूनच आमच्या विजयाचे श्रेय या दोघांना आम्ही देतो, असे ते म्हणाले. या मतदानाच्या वेळी दोघांनीही माझ्या नावापुढे पहिली पसंती दाखवली होती आणि त्यांच्यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जे काम केले आहे त्याबद्दल त्यांना भेटून त्यांचे आभार मानणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. दोघेही लवकर बरे होऊन समाजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे, अशी मी प्रार्थना करणार आहे, असे बोंडे म्हणाले.
यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
(शुक्रवारी) मतदानानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी एक विधान करुन खळबळ उडवून दिली होती. शनिवारी पहाटे लागलेल्या निकालावरुन बोंडे यांचे ‘ते’ विधान खरे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी ‘आम्हीच जिंकू’ असा दावा केला होता. बोंडे यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, शिवसनेचे उमेदवार संजय पवार यांच्यावर काल निशाणा साधला होता.“राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार,” असे विधान बोंडेंनी काल केलं होते.