महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२डिसेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २५ऑक्टोबर) महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. अनेक ठिकाणी संथगतीने कामे सुरू असल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा. विशेषतः खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली होती. परंतु त्याचा काही ठिकाणी काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
अचानक वातावरणात बदल झाल्याने शहरात पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. आधीच खड्यांमुळे वाहतूक संथ गतीने चालत आहे. त्यातच पावसाची भर पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अशीच परिस्थिती फेमस चौक-नवी सांगवी, कृष्णा चौकात पहायला मिळत आहे. येथील बाजारपेठेत सतत वर्दळ सुरु असते. मात्र येथील खड्डयांमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा खड्डा चुकविताना अपघात होण्याची दाट शक्यता असते.
यामुळे आता गंभीर अपघातानंतरच रस्त्याची दुरुस्ती होणार का अशी नागरिकांकडून तसेच बाजारपेठेतील दुकादारांकडून विचारणा होत आहे. अशा खड्यांमध्ये गाडी आदळल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे दुखणे सुरू झाले आहेत. काटे पुरम चौक परिसरात अनेक ठिकाणी ‘खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी खड्डयांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यात साठलेले घाण पाणी जाणाऱ्यायेणाऱ्याच्या अंगावर उडते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निष्कारण वादविवाद होतात.
पावसामुळे काटेपुरम चौक ते विनायक नगर दरम्यान खड्डे होऊन पावसामुळे त्या खड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप झालेले चित्र पहावयास मिळत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याने काही फरक पडेल असे वाटत होते, परंतु या ठिकाणी तरी तसे काही दिसून आले नाही. तरी स्थानिक लोकप्रतिनिधीनी आणि महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात झालेला विकास हा डोळे दिपवून टाकणारा आहे. त्याचे कौतुक बाहेरून शहरात येणारे अनेकजण करत असतात, त्यांचे आपल्या परिसरावर कायमच लक्ष असते. परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या काही चुकीच्या नियोजनाने नागरिकांना निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता पुन्हा आमदारांनाच लक्ष घालायला नाही लागले म्हणजे बरं …