महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७५ वा वर्धापन दिन (अमृत महोत्सव) साजरा होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला ( शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानंतर नाट्यगृहात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ७५ हजार कर्मचाऱ्यांमध्ये प्राध्यापकांचीही भरती होणार आहे. तसेच जी पदे मंजूर आहेत, त्यांचीच भरती होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले.
राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागा अंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे.
त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी १५ दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
त्यातून जवळपास ११ हजार २६ पदांची भरती होईल.
दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाच्या विभागांमधील रिक्त पदांची संख्या वाढल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची संख्या कमी झाल्याने पोलिस यंत्रणांवरील ताणदेखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दीड ते दोन महिन्यांत सरकारकडून ६७ हजार २३१ पदांची भरती होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी यावेळी सांगितले.
पावसाळी अधिवेशात विधानपरिषदेत बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राज्याच्या शासकीय विभागामधील रिक्त पदांची माहिती देत असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकार ७५ हजार पदांची भरती करेल, असे स्पष्ट केले होते.
त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांची सात हजार २३१ पदांची भरती लवकरच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार आता मेगाभरतीचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले आहे.
भरतीचे संभाव्य नियोजन
पोलिस पदभरती – ७२३१
‘एमपीएससी’मार्फत भरती – ११,०२६
गट ‘ब, क व ड’ची पदभरती – ६०,०००
भरती प्रक्रियेला सुरवात – १५ सप्टेंबरनंतर
डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा
राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा दिवाळीत होण्याची दाट शक्यता आहे. शासकीय पदभरतीची साडेपाच-सहा वर्षांपासून वाट पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.