महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणार्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. आता त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे त्यांची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता भगीरथ भालके यांची पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विशेष बाब म्हणजे ही निवड बिनविरोध झाली. आता खर्या भगीरथ भालके यांना चेअरमनपदी संधी दिल्याने ते जास्त अडचण करतील, असे दिसत नाही. या सर्व घडामोडीदरम्यान माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहीत मागणी केली आहे की, भालके यांच्या मतदारसंघातून पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी.
पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय. लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले पार्थ आता किती रस दाखवतात, हे पाहणे गरजेचे आहे. तसेच इतर नेते आणि विशेषकरून शरद पवार हे पार्थ यांचं पुनर्वसन करण्यात किती इच्छुक आहेत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. एकूणच सर्व परिस्थिती बघता पार्थ यांना ही जागा लढण्यास सोपे जाईल मात्र पार्थ यांना संधी मिळणार की भारत भालके यांच्या मुलाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
27 Comments