महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक २ ऑक्टोबर २०२१) : स्वच्छतेचे महत्व हे फक्त एका दिवसापुरते लक्षात न घेता स्वच्छतेचा संस्कार रुजविण्याची आणि स्वच्छता ही आपल्या सर्वांची जीवनशैली व्हावी असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात देशभरात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे.या अभियाना अंतर्गत नेहरू युवा केंद्र व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये आयोजित स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की,आपल्या देशातील नागरिक परदेशांमध्ये पर्यटक म्हणून जातात तेव्हा तेथील सार्वजनिक जागेतली स्वच्छता पाहून त्याबद्दल आवर्जून चर्चा करतात, अशीच स्वच्छतेबद्दलची चर्चा भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांनी देखील करावी यासाठी आपण सर्वांनी पराकोटीची स्वच्छता पाळण्याचे प्रयत्न करायला हवेत.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी सांगितले की, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वच्छतेचे व्रत स्वीकारायला हवे, असे केल्यास गाव, तालुका, जिल्हा, राज्य व संपूर्ण देशात स्वच्छता अभियान ही एक लोकचळवळ होऊ शकते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्लॉगिंग रन ला सुरुवात करण्यात आली. यशस्वी संस्थेचे कॅम्पस ते क्रांतीवीर चाफेकर पुतळा चौक या अंतरापर्यंत प्लॉगिंग रन मध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी प्लास्टिक कचरा संकलन केलं. १७ पोत्यांमध्ये एकत्र झालेल्या या कचऱ्याचे वजन १८३ किलो भरले. हा कचरा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा संकलन गाडीमध्ये योग्य विल्हेवाटीसाठी जमा करण्यात आला.
या स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभागीय संचालक डी. कार्तिगेयन,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप खोत,पालिकेच्या ब प्रभागाचे सभापती सुरेश भोईर, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या चिंचवडच्या संचालिका अरुणाताई मराठे, यशस्वी संस्थेचे संचालक संजय छत्रे,संस्थेचे ऑपरेशन हेड कृष्णा सावंत,संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील यांच्यासह विद्यार्थी, अध्यापक सहभागी झाले होते.
तर या कार्यक्रमासाठी संदीप गेजगे, महेश महांकाळ, अभिजित चव्हाण, ज्ञानेश्वर गोफण, शाम वायचळ, आदिती चिपळूणकर आदींनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.
11 Comments