महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 16 ऑक्टोबर :- दिवाळीचा पहिला आणि पारंपरिक सण मानल्या जाणाऱ्या वसुबारसचा उत्सव यंदा 17 ऑक्टोबर 2025 , शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराघरांत श्रद्धा आणि भक्तीभावाने गाई आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीत गाईला ‘गौमाता’ मानले जाते आणि तिच्या पूजनाने सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, असा विश्वास आहे.
याचेच औचित्य साधून चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपळे गुरव येथील ‘चंद्ररंग गोशाळा‘, इंग्रेसिया सोसायटीच्या जवळ, पिंपळे गुरव या ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या व महिला भगिनींच्या करिता “वसुबारस -” गोमाता पूजन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सायंकाळी 04 ते 06 या वेळात प्रसिद्ध गायक विशाल रसाळ यांच्या सुमधुर भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे.

अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी गोवत्स पूजनाची प्रथा आहे, ज्यामध्ये गाईसह तिच्या वासराचेही पूजन केले जाते. सकाळी लवकर स्नानानंतर घरातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत गाईची आरती करतात, तिला गोड पदार्थ आणि धान्याचा नैवेद्य अर्पण करतात.
वसुबारस सणाला धार्मिक तसेच कृषी दृष्टिकोनातूनही मोठे महत्त्व आहे. शेतीप्रधान देशात गाय हे एक पूजनीय आणि उपयुक्त प्राणी मानले जाते. गाय संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी गाईच्या पूजनाने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आगामी वर्ष समृद्धीचे जावो, अशी प्रार्थना केली जाते. वसुबारसानंतर दिवाळीतील इतर उत्सव, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज साजरे केले जातात.
वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हटले जाते. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी, म्हणजेच आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावा दिवस. उत्तर भारतातही हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात या दिवशी होते. यंदा द्वादशी तिथी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:34वाजता सुरू होऊन 18 ऑक्टोबरच्या पहाटे 4:41 वाजता संपेल. गाईच्या पूजनासाठी सायंकाळी 4:30ते 6:00या वेळेत शुभ मुहूर्त असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे.
ज्यांच्या घरी गाई आणि वासरे असतात, त्या कुटुंबांत विशेष सजावट केली जाते. गाईला अंघोळ घालून तिच्या अंगावर हळद, कुंकू व अक्षता लावल्या जातात. फुलांची माळ घालून ओवाळणी केली जाते. वासरालाही गोड धान्य, गवत आणि तुपकट पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यानंतर ‘गोवत्स व्रत कथा’ वाचण्याची किंवा ऐकण्याची प्रथा आहे. स्त्रिया या दिवशी उपवास करतात. अनेक ठिकाणी गहू व मूग खाणे टाळले जाते. उपवास सोडल्यानंतर बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगांची भाजी खाल्ली जाते. अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढण्याची सुरुवातही याच दिवसापासून होते.
वसुबारस सणामागे धार्मिकदृष्ट्या एक गहन महत्त्व आहे. धर्मशास्त्रांनुसार गाईत ३३ कोटी देवता वास करतात. त्यामुळे तिच्या पूजनाने सर्व देवतांचे पूजन होते. या दिवशी गाईची सेवा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते, असा विश्वास आहे. शेतीप्रधान संस्कृती असलेल्या भारतात गाईला केवळ पवित्र जनावर म्हणून नव्हे, तर कुटुंबाचा एक भाग मानले गेले आहे. त्यामुळे वसुबारसचा सण हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.
या सणाच्या निमित्ताने निसर्ग, प्राणी आणि मानव यांचा परस्परसंबंध जपण्याचा संदेश मिळतो. गोमातेच्या पूजनातून भक्तिभाव, कृतज्ञता आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा सुंदर संकल्प साकार होतो.


