महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५नोव्हेंबर) : काही दिवसांपासून मनक्याचा त्रास जाणवू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर मनक्याची शस्त्रक्रिया देखील पार पडली.
त्यानंतर आता उद्धव ठाकरे फिजिओथेरपीचे उपचार घेत आहे. अशातच आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगिण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी नेमका डिस्चार्ज कधी मिळणार आणि मुख्यमंत्री कामावर पुन्हा कधी रुजू होणार यावर कोणतंही भाष्य करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा आता राजकारणात होताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्याचा तात्पुरता कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की शिवसेनेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची संधी अनेकवेळा हुकली आहे. त्यामुळे अजित पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर देखील आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नावांना समर्थन मिळताना दिसत आहे.