महाराष्ट्र 14 न्यूज : शेतकरी आंदोलनात केवळ पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचं सांगण्यात येतं. पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय साधा आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पंजाब, हरियाणाचा शेतकरी गेल्या 60 दिवासांपासून आंदोलन करत आहे. पण केंद्र सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करतोय, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी आझाद मैदानात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी नेते अजित नवले, शेकाप नेते जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सपा नेते अबू आजमी, अशोक ढवळे, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होते. यावेळी पवारांच्या हस्ते शेतकरी आंदोलकांसाठी अन्न पुरवठा करणाऱ्या शीख बांधवांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर शरद पवारांनी आझाद मैदानातून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार तोफ डागली. ही लढाई केवळ शेतकऱ्यांची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबाबत कवडीचीही अस्था नाही. 60 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर बसलाय. पण देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची चौकशी केलीय का? असा सवाल पवार यांनी केला.
दिल्लीत आंदोलन करणारा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणातील असल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे काय? असा संतप्त सवालही त्यांनी केला. स्वातंत्र्याच्या काळात याच पंजाबच्या शेतकऱ्याने जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण केलं. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यातही पंजाबच्या शेतकऱ्यांनी प्राण पणास लावले. अर्ध्या देशाला अन्न पुरवणारा हा बळीराजा आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ
मोर्चानंतर राज्यपालांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं मला सांगण्यात आलं. पण मी महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही. या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण बळीराजाला भेटायला वेळ नाही, असा टोला पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांचं आंदोलन होतं हे राज्यपालांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी राजभवनात थांबायला हवं होतं. पण तेवढं धैर्य त्यांनी दाखवलं नाही. ते गोव्यात गेले. पण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
17 Comments