महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६जून) : दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
73 Comments