महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑगस्ट) : अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा उल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक भाष्य केलं. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली आहे. अफगाणिस्तानातील घडमोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा उल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक भाष्य केलं आहे. दहशतीच्या बळावर साम्राज्य निर्माण करणारी वृत्ती फार काळ टिकत नाही, असं भाष्य मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२० ऑगस्ट) गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादही साधला. या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख टाळत दहशतवादाबद्दल भाष्य केलं.
मोदी म्हणाले, ‘भारताच्या प्राचीन गौरवाचं पुनर्जीवन करणारे लोहपुरूष सरदार पटेल यांना मी नमन करतो. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही प्रमाण करतो. त्यांनी विश्वनाथापासुन ते सोमनाथपर्यंत कितीतरी मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यांचं जीवन म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकतेचा संगम होता. त्यांचा आदर्श ठेवूनच देश पुढे जात आहे’, असं मोदी यांनी सांगितलं.
सोमनाथ मंदिराविषयी बोलताना मोदी म्हणाले, ‘शेकडो वर्षांच्या इतिहासात या मंदिराला कितीतरी वेळ तोडलं गेलं. इथल्या मूर्तीची विटंबना केली गेली. याचं अस्तित्व मिटवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले गेले. पण, जितक्या वेळा मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तितक्या वेळा मंदिर पुन्हा उभं राहिलं आहे’, असं भाष्य मोदी यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांचा उल्लेख टाळत मोदींनी दहशतवादावर भूमिका मांडत तालिबानला सूचक इशारा दिला. ‘ज्या विभागणी करणाऱ्या शक्ती आहे; जे दहशतवादाच्या बळावर साम्राज्य उभं करणारी वृत्ती आहे. ते एखाद्या कालखंडात काही काळ ताकदवान होतात, पण त्यांचं अस्तित्व कधीही चिरंतनकाळ टिकत नाही. ते जास्त काळ मानवतेला दाबून ठेवू शकत नाही,’ असं मोदी म्हणाले.
14 Comments