महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीच्या दहशतीमुळे असलेले निर्बंध शिथिल झाले असल्याने यंदाच्या आषाढी वारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा पंढरपूरची वारी निर्धोक वातावरणात भक्तांच्या मेळाव्यात व्हावी, असं चित्र आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्तांना ओढ लागलेली असते. दोन वर्षं इच्छा असूनही अनेकांना वारीत सहभागी होता आलं नाही. पायी चालत वारी झालीच नाही. यंदा मात्र प्रथेप्रमाणे पायी वारी आणि सर्व संतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीने विठ्ठलनामाच्या गजरात निघू शकली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा कसा असेल याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी नुकतीच माध्यमांना दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या वर्षी तिथीच्या वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील.
दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली. दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला वारीसोहळा नियोजनाची बैठक होते. यावेळच्या बैठकीनुसार आषाढीच्या वारीसाठी माउलींच्या पालखीचं प्रस्थान 21 जूनला आळंदीहून ठेवलं जाईल.
22 आणि 23 जूनला पालखी पुणे मुक्कामी असेल. शुक्रवारी दिवेघाट मार्गे सासवडला जाईल. 9 जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असा (Dnyaneshwar maharaj Palkhi schedule) मंगळवारी 21 जूनला 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीहून प्रस्थान ठेवेल.
बुधवारी, गुरुवारी 23, 24 जूनला पुणे, शनिवार 25 जून- सासवड, रविवार 26 जून जेजुरी, सोमवार 27 जून वाल्हे, मंगळवार 28 जून, बुधवार 29 जून लोणंद, गुरुवार 30 जून तरडगाव, शुक्रवार व शनिवार 1 आणि 2 जुलै फलटण, रविवार 3 जुलै बरड, सोमवार 4 जुलै नातेपुते, मंगळवार 5 जुलै माळशिरस, बुधवार 6 जुलै वेळापूर, गुरुवार 7 जुलै भंडीशेगाव, शुक्रवार 8 जुलै वाखरी तर शनिवार 9 जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार 10 जुलैला आषाढी एकादशी आहे.
चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावीत उभे रिंगण तर पुरंदावडे (सदाशिवनगर), पानीव पाटी, ठाकुर-बुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या नोंदणीकृत आहेत. नोंदणी नसलेल्या सव्वाशे ते दीडशे दिंड्या आहेत.
सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. 15 मे पर्यंत वाहन पाससाठी नंबर द्यावे वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मेपर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नाव व मोबाइल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊलीसोबत सुमारे पाच लाख वारकरी राहण्याची शक्यता आहे. ॲड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख.